रस्त्यावरील अवजड वाहने हटविण्याची शेकापची मागणी

नेरूळ, नवी मुंबई: नेरूळ सेक्टर ८ परिसरात स्टेशन रोडवर दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे वाहतुक कोंडी होते. याशिवाय पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करून तेथून हटविण्याची लेखी मागणी शेतकरी कामगार पक्षचे नवी मुंबई जिल्हा सेक्रेटरी विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी वाहतुक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
या परिसरात दोन मोठी पालिकेची सार्वजनिक उद्याने, रूग्णालये, बाजारपेठ, शाळा तसेच सिडकोचा निवासी परिसर असल्याने सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत रहीवाशांची, मुलांची, महिलांची, ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्यावर येथे ‘अवजड वाहने उभी करू नयेत’ असा फलक लावलेला असतानाही मोठ्या प्रमाणावर बाराही महिने सकाळी, दुपारी, रात्री अवजड वाहने बिनधास्तपणे उभी असतात. स्टेशनरोडवर आधीच वाहनांची व रहीवाशांची वर्दळ असते. त्यात ही अवजड वाहने दोन्ही बाजूला उभी असल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी होते. अवजड वाहने रस्त्यावर असल्याने पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. त्यातच अवजड वाहनांचा आधार घेत रस्त्याच्या कोपऱ्यावर अनेकजण लघुशंका करतानाही आढळतात. रात्रीच्या अंधारात अवजड वाहनांचा फायदा घेवून महिलेचा विनयभंग अथवा अत्याचार होण्याचीही भीती  विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढताना उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांवर सातत्याने कारवाई केल्यास कोणीही या ठिकाणी अवजड वाहने उभी करण्याचे धाडस दाखविणार नसल्याचे विरेंद्र म्हात्रे यांनी म्हटले आहे.
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *