सह्याद्रीचा वाघ "राघोजी भांगरे"

“गाथा बलिदानाची” यात आज एका अशा क्रांतिकारकाची माहिती आपल्या समोर आणत आहे, जे नाव कदाचित आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत देखील नसेल. माहिती मोठी आहे, पण अंगावर रोमांच उभी करणारी आहे. आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा. आपले यावरचे विचार नक्की कळवा.
अकोले तालुक्यातील देवगाव हे दोनशे ते तीनशे लोकांचे गाव असेल. शोण नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे रामजी सुभेदार होते.
राघोजी यांच्यावर खूप चांगले संस्कार लहानपणा पासूनच होते. गावात शिक्षणाची सोय नसल्याचे राघोजी यांच्यासाठी खास घरातच शिक्षणाची सोय केली होती. खेलाबागडण्याच्या वयात राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाणा साधने, घोडेस्वारी शिकून तरबेज झाले.  त्यांच्या अंगातील धाडसी गुण लहानपणीच गावकऱ्यांना दिसून येत होते. लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने त्यांचे शरीर चांगलेच पिळदार आणि सुदृड होते.
मित्रांसोबत राघोजी शिकारीला गेले असता, त्यांच्या बंदुकीची गोळी एका वाघाला चाटून गेली. घायाळ वाघ हा पलटून वार करतोच आणि त्याने केला. पण राघोजीने तेथून पळ न काढता वाघाशी झुंज देवून त्याचा जबडा फाडला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरून राघोजींच्या पराक्रमाचे कौतुक होऊ लागले.
राघोजी भांगरे एकीकडे मोठे होत असताना, मोठमोठे पराक्रम करत होते आणि दुसरीकडे मात्र इंग्रज अकोल्यातील रतनगड ताब्यात घेण्यासाठी तयारीत होती. मॅकींनटॉस या अधिकाऱ्याने आदिवासी क्रांतिकारी यांचे अस्तित्व संपवण्यासाठी सात हजारची फौज घेऊन रतनगडावर आक्रमण केले. तेव्हा राघोजींच्या वडिलांसोबत म्हणजेच रामजी भांगरे यांच्या सोबत गडावर फक्त पाचशे मावळे होते. कडवी झुंज त्या मावळ्यांनी आणि रामजी यांनी दिली. जवळपास तीन हजार इंग्रज शिपाई त्यांनी मारले. पण शेवटी त्यांना शरणागती पत्करावी लागली. रामजी यांना देशद्रोह मार्फत खटला चालवून नंतर काळ्यापाण्याची शिक्षा झाली.
वडिलांच्या अनुपस्थितीत राघोजी भांगरे आपल्या गावात पोलीस पाटील या पदाचा कारभार चालवीत होते. गावातील भांडणे मिटविणे, न्याय निवाडा करणे, गावचा महसूल गोळा करून तो सरकारच्या तिजोरीत जमा करणे. अशी कामे ते करत होते. आपल्या वडिलांचे राजूर प्रांताचे पद जाऊन त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत होती. आपल्या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्यात राघोजीला इतरांपेक्षा अधिक मान होता. सुमारे एक वर्षापासून रिक्त असलेल्या राजूर प्रांताच्या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजीने अर्ज केला. या अर्जात त्याने माझ्या वडिलांचे पद मलाच मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. परंतु सरकारने ही मागणी फेटाळून लावत त्या जागी अमृतराव कुलकर्णी याची नेमणूक केली. या घटनेने राघोजी अधिक दुखावला गेला व त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांचे कधीच पटले नाही. अमृतराव कुलकर्णी याच्याशी तर त्याचे कधीच पटले नाही.
कोकणामध्ये एक दिवस मोठा दरोडा पडला. या दरोड्यात राघोजी भांगरे यांचा हात असल्याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरता तपास न करता राघोजीला तातडीने अटक करण्याचा आदेश दिला. त्या आदेशानुसार अमृतराव कुलकर्णी यांनी आपल्या हवालदारास राघोजीला नोटीस बजावण्यास सांगितले. आपल्यावरील खोट्या आरोपाची माहिती राघोजीच्या कानावर पडताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राघोजींच्या मनातील घालमेल ओळखून देवजी नाना यांनी त्यास पोलिसांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. या दगाबाज इंग्रज सरकारला धडा शिकवायचा असा बेत मनात आखून राघोजी दुसऱ्या दिवशी राजूर पोलीस स्टेशनला हजर झाला. आपल्यावरील खोट्या आरोपाचा जाब विचारायला लागल्यावर पोलीस अधिकारी राघोजीला कायद्याची भीती दाखवू लागले. या दरम्यान राघोजी व अमृतराव कुलकर्णी यांच्यात बाचाबाची झाली. याचे रुपांतर शेवटी झटापटीत झाले. वाघाशी दोन हात करणारा राघोजी पुरता पेटून उठला होता. त्याने एका झटक्यात साहेबाचं नरडं दाबून त्याला मारून टाकलं. राघोजीचा असा अवतार पाहून बाकीचे हवालदार कधीच पळून गेले होते. परत फिरताना राघोजीने पोलीस स्टेशनमधील सात रायफली व काडतुसांची पेटी हातात घेतली. इंग्रजांनी केलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी राघोजी सज्ज झाला होता.येथून पुढचा प्रवास अधिक संघर्षमय असेल याची जाणीव त्याला झाल्याने त्याने आईचा आशीर्वाद घेऊन घर सोडले व बाडगीच्या घनदाट जंगलाचा रस्ता धरला. यावेळी त्याच्यासोबत तरणाबांड तुफान ताकदीचा नेमबाजीत पटाईत असलेला शूर लढवय्या राया ठाकर होता. तसेच देवजी आव्हाड यांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभत होते.
राघोजी भांगरे याचे संघटन कौशल्य खुपच चांगले व त्यांच्या कार्याची जाणीव सर्वांना असल्याने आठ दिवसात मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण म्हणजे प्रवरा खोरे, बारागाव पठार म्हणजे प्रवरा खोरे या परिसरातून विविध जाती जमातीचे अनेक तरुण त्यांना येऊन मिळाले. अन्यायी, अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजीच्या नेतृत्वाखाली सर्वजण करू लागले. जंगलात राहून वेळप्रसंगी भाजी-भाकरी, चटणी खाऊन, तर कधी उपाशी पोटी जनसंपर्क करत होते. सरकारवर विसंबून राहू नका, सरकारला कोणताही कर भरू नका. तुमचा कर राघोजीला द्या. तो तुम्हाला मदत करील असे आवाहन सगळीकडे करण्यात येऊ लागले. अगोदरच सावकारांच्या जाचाला व इंग्रजांच्या अन्यायी धोरणाला वैतागलेले सामान्य लोक न्याय मागण्यासाठी राघोजीकडे येऊ लागले. अशा प्रकारे महाकाळ डोंगरावर बंडाचं पहिलं निशाण फडकविण्यात आलं.
राघोजीनं काही महिन्यांच्या कालावधीत परिसरातील सर्व जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या व त्यांची धनसंपदा लुटून गोर गरीबांना वाटून टाकली. तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे कागदपत्र व दस्तऐवज यांची होळी केली. आया बहिणींवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान- नाक कापले. हजारो, लाखो एकर जमिनी सामान्य लोकांना परत मिळवून देण्याचे काम राघोजीने केल्याने सावकार व इंग्रजांवर त्याची दहशत बसली होती. अकोले तालुक्यातील पाभूळवंडी, लाडगाव, आंबेवंगण ही चारी गावे ललूभाई या सावकाराकडे होती. वसुलीसाठी हा सावकार या परिसरातील आदिवासी बांधवांची पिळवणूक करत असे. सर्वांच्या जमिनी त्याच्या ताब्यात असल्याने कोणी त्याच्या अन्यायाविरोधात बोलत नव्हते. याची जाणीव राघोजीला अगोदरच होती. देवजी आव्हाड यांच्या सल्ल्यानुसार ललूभाईवर धाड टाकण्याचे नियोजन करण्यात आले. रात्री सगळीकडे शांतता पसरल्यावर त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला. ललूभाईकडून तिजोरीच्या चाव्या हिसकावून घेऊन त्यातील पैसे व दागिन्यांच्या दोन गोण्या भरल्या. शेतीच्या कागदपत्रांचा शोध घेऊन त्यावर तेल ओतून पेटवून दिले. अशा प्रकारे सावकारशाही विरोधातील पहिले पाऊल राघोजीने आपल्या साथीदारांच्या मदतीने अचूक टाकले होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजूर ही एक मोठी बाजारपेठ होती. या एकाच पेठेत अनेक सावकार, जमीनदार राहत होते. त्यामुळे बाहेरून येणारे व्यापारीही मोठ्या प्रमाणात राजुरच्या पेठेला भेट देत असत. राजूरच्या चारही बाजूंचा परिसर बघितला तर मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकरी बांधवांचे वास्तव्य होते. अधिक नफा कमवायच्या हेतूने सावकार व जमीनदार या सर्व लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत होते. एकदा काढलेले कर्ज कधीही फिटत नसे. अशा प्रकारची अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी हे सर्व करत होते. दिलेल्या कर्जाच्या बदल्यात जमिनी मात्र आपल्या नावावर करून घेण्याचा धडाका त्यांनी लावला होता. ज्यांच्या जमिनी सावकार ताब्यात घेत त्यांनाच कसायाला देत असत. सामान्य शेतकरी जमीन कसून उत्पन्न काढत असे व सावकार सर्व पिकलेलं धान्य वाहून नेत असत. रक्ताचं पाणी करूनही हातात काहीच पडत नसल्याने अनेकांची उपासमार होत असे. या दुष्टचक्रातून शेतकरी व आदिवासींना बाहेर काढण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे असा विचार राघोजीच्या मनात आला. परंतु राजूरमधील सावकारांना सरकारचे संरक्षण असल्याने त्यांची सावकारशाही संपुष्टात आणणे वाटते तितके सोपे काम नव्हते. राघोजीने पूर्ण अभ्यास व नियोजन करून एक दिवस राजूर बाजारपेठेवर धाड टाकली. या धाडीत राघोजीने सावकारशाहीला चांगलाच धडा दिला व प्रचंड लुटही आपल्या ताब्यात घेतली. यानंतर लगेच जवळच असलेल्या कोतूळ येथील बाजारपेठेवरही हल्ला करून तेथील सावकारांच्या त्रासापासून लोकांची सुटका केली. राघोजी भांगरे यांच्या वाढत्या दबदब्यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात पळून गेले.
इंग्रज आपली सत्ता सावकार व जमीनदार यांच्या मदतीने वाढवत असत. परंतु राघोजी भांगरे याने सावकारशाहीवर आपला विजय मिळविण्याचा धडाका लावल्यामुळे त्याचा इंग्रजांवर मोठा परिणाम होऊ लागला होता. या प्रकाराने इंग्रज अधिकारी चांगलेच हादरले होते. राघोजीचा सामान्य जनतेला पाठिंबा असल्याने सर्वसामान्य माणूस इंग्रज सत्तेविरोधात बोलण्याचे धाडस करू लागला होता. नेमके हेच इंग्रज सरकारला नको होते. राघोजीचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर आपली या भागातील सत्ता जाईल या भीतीने २०० बंदुकधारी शिपायांची तुकडी घेऊन कॅ. थॉमस यास जबाबदारी नेमून दिली. कॅ. थॉमस यांस त्याच्या गुप्तहेरांनी खबर दिली कि, राघोजी सध्या कुलंग गडावर वास्तव्यास आहे. त्यानुसार घनदाट जंगलातून वाट काढत अलंग गडाच्या माचीतून कॅ. थॉमस आगेकूच करू लागला होता. तिकडे राघोजीला याची खबर अगोदरच मिळाल्याने त्याने कॅ. थॉमस याचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्ण नियोजन केले होते. कॅप्टनने अलंगगडाच्या माचीचे घनदाट जंगल ओलांडून पुढे जायला सुरुवात करताच पाठीमागून बापू भांगरे यांनी आपल्या साथीदारांसह जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने व खूप अंतर पायी चालल्याने परतीचा हल्ला करण्याची क्षमता कॅप्टनच्या शीपायांत उरली नव्हती. देवजी आव्हाड यांनीही दुसरीकडून हल्ला चढवला. एकच आवाज त्या झाडांमध्ये येत होता, “पळा पळा.’’ कॅप्टनचे शिपाई वाट दिसेल तिकडे पळू लागले. झाडीत लपून बसलेल्या देवजी आव्हाड यांच्या साथीदारांनी एका एका सैनिकाचे मुंडके उडविण्याचे काम केले. धरमा मुंढे, खंडू साबळे हे सुद्धा आता समोरून तुटून पडले होते. या घनदाट जंगलात नक्की किती लोकांनी आपल्यावर हल्ला केला आहे याची कल्पना कॅप्टनला येत नव्हती. कॅप्टन वेड्यागत चौफेर फायरिंग करत परतीच्या वाटेने खाली उतरण्यासाठी पळत होता. या धावपळीत झाडांमधून आलेली एक गोळी कॅप्टनच्या डाव्या मांडीला चाटून गेली होती. यामुळे कॅप्टनने आपला जीव वाचविण्याच्या इराद्याने लपत छपत मागे फिरला. तो मिळेल त्या वाटेने थेट काळुस्ते या गावात उतरला. या धुमश्चक्रीत राघोजीच्या मावळ्यांनी एकशे शहाण्णव शिपायांची कत्तल केली होती. या लढाईत राघोजीला मोठ्या प्रमाणात काडतुसे हाती लागली होती. इंग्रज सरकार राघोजीच्या या कृत्याने प्रचंड हादरले होते. राघोजीचे बंड मोडीत काढण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नवे नवे बेत आखत होते. परंतु कोणाला यश मिळत नव्हते. इंग्रज सरकारच्या समोर त्याला रोखायचे कसे याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.  राघोजीच्या घरातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. बाया माणसांच्या वक्षस्थळांना टिपऱ्या लावल्या. वारंवार राघोजीच्या घरी धाडी घातल्या. तरीही हाती काही लागत नसल्याने शेवटी त्याची आई रमाबाईला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्या अंगावर चाबकाचे फटके मारले. तिच्यावरही शक्य तितके क्रूर अत्याचार केले. परंतु आई रमाबाई डगमगली नाही. तिने इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांच्या अन्यायी वागण्याबद्दल खडे बोल सुनावले. गावागावात जाऊन महादेव कोळी व ठाकर समाजातील लोकांना छळण्यात आले. परंतु त्याचा काहीही एक फायदा इंग्रजांना झाला नाही.
राघोजीने हाती घेतलेले स्वातंत्र्याचे कार्य सातारचे राजे प्रतापसिंह भोसले यांना खूप आवडले होते. इंग्रज सरकारने कपट कारस्थाने करून भारतातील अनके संस्थाने खालसा केली होती. साताऱ्याचे  संस्थान देखील असेच खालसा केल्याने राजे प्रतापसिंह दुखावले गेले होते. त्यांनी आपल्या खाजगी गुप्तहेरामार्फत राघोजी भांगरे यांना खलिता पाठवून साताऱ्याला भेटीला येण्याचे आमंत्रण दिले. निरोप मिळताच राघोजीने साताऱ्याला जाऊन राजे प्रतापसिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराजांनी राघोजीला दोनशे पन्नास घोडे, हत्यारे, बंदुका, तलवारी, भाले आदींची भेट देऊन मोठ्या सन्मानाने बोळवण करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कॅप्टन माकिंटोश याने जुन्नरच्या बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला व हा उठाव कसा रोखायचा व राघोजी कसा जाळ्यात अडकावायचा याचे नियोजन केले. यासाठी सोबत त्याने दहा हजारांची फौज व तोफखाना घेतला होता. तिकडे राघोजीकडे फक्त दोन हजार सैनिक होते. शेवटी ठरलेला दिवस उगवला. राघोजी भांगरे  व त्याच्या सर्व साथीदारांनी जुन्नरच्या बाजारपेठेत ‘हर हर महादेव’ची गर्जना करत प्रवेश केला. कॅप्टन माकिंतोषने जुन्नरला बाहेरून वेढा दिला व राघोजी भांगरे आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी हालचाली सुरु केल्या. दोन्ही सैन्य समोरासमोर येताच एकच लढाई सुरु झाली. राघोजीचे मावळे आपले सारं देहभान हरपून लढत होते. एकीकडे कॅप्टन माकींतोष ची फौज कमी कमी होत होती, तर दुसरीकडे राघोजीचे शंभर एक मावळे शिल्लक राहिले होते. देवजी आव्हाड यांनी वस्तुस्थितीचे भान राघोजीच्या लक्षात आणून दिले. ऐंशी टक्के फौज कामी येऊनही कॅप्टन माकिंटोष च्या हाती राघोजी भांगरे लागला नव्हता. जुन्नरच्या बाजारपेठेचा फायदा उठवत तो सहीसलामत बाहेर पडला होता.
जुन्नरच्या उठावात मोठ्या प्रमाणात साथीदार गमावल्याने राघोजी दुखी झाला होता. आता भूमिगत राहून काम करण्याचा निर्णय घेतला. राया ठाकर व देवजी आव्हाड यांच्या सोबत त्याने गोसाव्याचे रूप धारण केले. मावळ प्रांतात गावोगावी फिरून लोकांना जागृत करण्याचे काम करू लागले. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये व गाव ईनाम देण्याची घोषणा केली होती. राघोजी फिरता फिरता पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला  पोहचला. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. बारीत उभे असताना दुरून एक पोलीस राघोजीचे निरीक्षण करत होता. राघोजीचे मात्र त्या पोलिसाकडे लक्ष्य नव्हते. पोलिसाला दर्शन रांगेत राघोजी भांगरे उभा असल्याची खात्री पटली. क्षणाचाही विलंब न करता त्याने कॅप्टन गिलला निरोप दिला. त्यावेळी गिलची नेमणूक तिथेच होती. निरोप मिळताच कॅप्टन गिल शेकडो पोलिसांना घेऊन मंदिरात हजर झाला. सर्वांनी राघोजीला वेढा दिला व त्याच्याकडे बंदुका रोखल्या. राघोजी निशस्त्र असल्याने तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. साखळदंडात कैद करून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात राघोजीला ठाण्याच्या कारागृहात आणण्यात आले. त्याच्यावर खटला भरण्यात आला. राघोजी भांगरे याच्या कोणत्याही मताचा विचार न करता एकतर्फी निकाल घोषित करण्यात आला. दुर्दैव म्हणजे राघोजीला वकील मिळू नये म्हणून इथल्याच उच्च वर्णीय लोकांनी प्रयत्न केले होते. कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा जाहीर केली. राघोजीला फाशी देण्यापूर्वी वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी राघोजी भांगरे हा एक महान, शूर, लढवय्या, धाडसी वीर असल्याने त्याचे तैलचित्र काढून कारागृहात लावण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला देखील इथल्या उच्च वर्णीय लोकांनी हाणून पाडले.
फाशीपूर्वी राघोजीला शेवटची इच्छा विचारण्यात आली. “फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या” असे त्याने इंग्रज अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. जेव्हा एप्रिल महिन्यात राघोजीला फाशी देण्यात आली तेव्हा त्याचा पिळदार शरीरयष्टीने फाशीचा दोर देखील तुटला आणि मग त्या नंतर शेवटी दि. २ मे १८४८ रोजी ठाणे येथील कारागृहात राघोजीला फाशी देण्यात आली. अशा प्रकारे हसतहसत सह्याद्रीचा वाघ आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी हुतात्मा झाला.
संदर्भ : १) ‘तुफानी वादळ’ – श्री निवृत्ती भिवा धोंगडे
२) ‘सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी’ – डॉ.गोविंद गारे
३) Gazetteer of India – Maharashtra State, Ahmednagar District
संकलन:- आदित्य अनिल जोशी
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *