इंग्लंडचं कमबॅक, मालिका बरोबरीत

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पाच गडी व दोन चेंडू राखत विजय मिळावीत इंग्लंडने तीन सामान्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. कार्डिफ: पहिल्या टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवलेल्या भारतीय संघाला यजमान इंग्लंडने शेवटच्या षटकात पराभूत करीत तीन सामान्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत काढली आहे. अलेक्स हेल्सचं नाबाद अर्धशतक व गोलंदाजांनी केलेली अचूक गोलंदाजी इंग्लंडला पोषक ठरली. कार्डिफच्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्मा – शिखर धवन या भारताच्या सलामी जोडीने सावध सुरवात करण्याचा प्रयत्न केला परंतु दबावात येत रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात ५ धावंच योगदान देत तंबूत परतला. त्यानंतर लगेचच धवनही १० धावा करीत स्वस्तात परतल्याने भारताचा डाव मोडखळीस आला. विराट कोहली (४७), महेंद्र सिंग धोनी (नाबाद ३२) व सुरेश रैना (२७) यांच्या खेळीमुळे भारताने कसाबसा १४८ धावांचा पल्ला गाठला. मागच्या सामन्यात नाबाद शतक झळकावणारा के. एल. राहुल केवळ सहा धावंच योगदान देऊ शकला. इंग्लंडतर्फे डेव्हिड विली, जॅक बॉल, प्लंकेट, आदिल रशीद यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करता आला. पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंड संघाने आक्रमक सुरुवात करण्यावर भर दिला. पण उमेश यादवचा एक स्विंग चेंडू जेसन रॉयच्या बॅट व पॅडच्या मधोमध थेट स्टम्प्सवर आदळला आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. यादवने पाचव्या षटकात फॉर्मात असलेल्या जोस बटलरला कोहलीकरवी झेलबाद करीत इंग्लडला आणखी एक धक्का दिला. चहलने सातव्या षटकात जो रूटला तंबूत धाडीत इंग्लंडची अवस्था तीन बाद ४४ अशी केली आणि भारत सामना झुकवेल कि काय अशी स्थिती निर्माण झाली. अलेक्स हेल्सने एका हाती किल्ला लढवीत इंग्लडला लक्ष्यापर्यंत पोहचवले. ४१ चेंडूंचा सामना करीत चार चौकार व तीन षटकार खेचत नाबाद ५८ धावांची इनिंग खेळली. इंग्लंडने दोन चेंडू व पाच गडी राखत विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *