टंचाईग्रस्त गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी विहीरी खोदाईच्या कामास प्राधान्य- रवींद्र वायकर

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, बोअरवेल खोदणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या काळात टंचाईची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी विहीरी खोदाईच्या कामास प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे आयोजित जिल्हा वार्षिक योजना नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी खरेदी केलेल्या एक्सव्हेटर यंत्रसामग्री लोकार्पण सोहळा आणि जलयुक्त शिवार योजनेतून शिवकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभप्रसंगी श्री. वायकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, आमदार सदानंद चव्हाण, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, खडपोलीच्या सरपंच मुस्कान अडरेकर आदी उपस्थित होते. श्री.वायकर म्हणाले, पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी शासन विविधस्तरावर उपाययोजना करत आहे. याचबरोबर पाणी पातळी वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाण्याचे स्त्रोत बळकट करुन कायमस्वरुपी पाणी साठा निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून खडपोली येथील शिवकालीन तलावाचा गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढल्यानंतर तलावाची क्षमता 620 दशलक्ष लिटरवरुन एक हजार 770 दशलक्ष लीटरपर्यंत वाढणार आहे. शिवाय तलावाच्या परिसरातील विहीरी, बोअरवेल यांची पाणी पातळीसुद्धा वाढणार आहे. पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 2 कोटी 31 लाख रुपये खर्च करुन गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. येत्या काळात या सामग्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलस्त्रोत बळकट करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात गरज भासल्यास तालुकास्तरावरदेखील असे साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल, तसेच कोयनेचे अवजल चिपळूण परिसरातील गावांना उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सर्व्हे करण्यात येत आहे. त्यासाठी 15 लाखाचा निधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून गोवळकोट ते परशुराम परिसर रोपवे उभारणीच्या अभ्यासासाठी 15 लाख रुपये देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. आमदार श्री.चव्हाण यांनी खडपोली शिवकालीन तलावातील गाळ काढण्यामुळे परिसरातील पाणी पातळीत वाढ होऊन पुरेसे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी लोकांनी प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या यंत्रसामग्रीचा उपयोग करुन पाऊस सुरू होण्यापूर्वी गाळ काढण्यासाठी प्रयत्नशील रहावे आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्यासाठी नियोजन करुन त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी गाळ काढण्याच्या कामासाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीचे पालकमंत्री श्री.वायकर व आमदार श्री.चव्हाण यांनी तज्ज्ञांच्या मदतीने प्रात्यक्षिक करुन बघितले. साभार: महान्यूज]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *