2 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 100 शहरे निर्मल व स्वच्छ करणार – मुख्यमंत्री

नागपूर : राज्यातील लहान शहराच्या सर्वांगिण विकासासोबत पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन व निर्मल करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील 300 शहरांपैकी पहिल्यांदाच 50 शहरे निर्मल झाले असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत 100 शहरे निर्मल व घनकचरा मुक्त शहरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाडी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजना टप्पा तीनचे भूमीपूजन तसेच 40 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री समीर मेघे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, गिरीष व्यास तसेच नगराध्यक्ष श्रीमती प्रतिक्षा पाटील, उपाध्यक्ष नरेश चरडे, वाडी नगर परिषदेचे सर्वपदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडी शहराला कायम पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल विकास कार्यक्रमाअंतर्गत टप्पा 1 व 2 ची कामे पूर्ण करण्यात आली असून टप्पा 3 साठी 13 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाडी शहराचा कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गोरेवाडा येथून पाणी पुरवठा करण्याचा योजना प्रस्तावित असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहरा लगत असूनही वाडीचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नाही. या शहराचा विस्तार वाढला असला तरी नागरिकांना सोयी सुविधा पुरवू शकलो नाही. त्यामुळेच वाडीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भुयारी गटार योजनेसह येत्या एक वर्षात लोकसहभागातून स्वच्छ व निर्मल करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाडी या गावाच्या लोकप्रतिनिधी म्हणून यापूर्वी कार्यरत असताना विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असून जिल्ह्यातील नगर परिषदांच्या विकासासाठी 350 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापैकी 40 कोटी रुपये वाडी शहरासाठी असून यापुढेही अधिक निधी देण्याचा तसेच आंबेडकर नगरवासियांना मालकी हक्क पट्टे देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाडी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडवितानाच घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना करताना शहरातून वाहत जाणाऱ्या गटारातील पाण्याचा पुनर्वापर करण्या संदर्भात प्राधान्याने निर्णय घ्यावा. वाडी शहर हे आदर्श शहर म्हणून विकसित करण्यासाठी येत्या 25 वर्षाचे विकासाचे विजन तयार करावे व त्यानुसार नियोजनबद्ध विकास करावा. हिंगणा येथून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यांसाठी 1 हजार 200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा शहरातील तसेच वाडीतील वाहतुकीमुळे होणारी कोंडी तसेच अपघाताचे प्रमाणही कमी होतील. बाह्यवळण रस्त्यांवर लॉजेस्टिक पार्क तयार करुन शहरातील व वाडी येथील सर्व गोडाऊन तेथे स्थलांतरीत करावे, अशी सूचना करताना मेट्रो रेल्वे हिंगणा, वाडी व अमरावती रोड मार्गे धावण्या संदर्भातही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर शहर व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे हे शहर देशातील उत्कृष्ट शहर म्हणून ओळखले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याची स्वतंत्र मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना तयार केली असून यासाठी अडीच हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारमुळे भूगर्भात पाणी साठवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रथमच राबविण्यात येत असून राज्यातील पिण्यासाठी व शाश्वत सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वच्छ वाडी सुंदर वाडी करण्याला प्राधान्य देण्यात आले असून वाडीच्या विकास कामासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण निधी देण्यात येईल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पेरी अर्बन योजनेतून गोरेवाडामधून वाडीला पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी आमदार समीर मेघे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर केलेल्या प्रास्ताविकात वाडीचा पिण्याचा पाण्यासाठी महत्वकांक्षी असलेल्या योजना येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल. वाडी येथे ट्रान्सपोर्ट प्लाझा तसेच आंबेडकर नगर येथील नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन गटनेते प्रेम झाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा पाटील यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष नरेश चरडे, बांधकाम समिती सभापती हर्षल काकडे, वाडी शहर अध्यक्ष केशव गोंधळे, राजेश जयस्वाल, नरेंद्र लेंडे, मुख्याधिकारी राजेश भगत, नगरसेविका निता पुणावार, राकेश मिश्रा, केशव बांधरे, अस्मिता मेश्राम, सभापती कैलास ममतापुरकर आदी उपस्थित होते. साभार: महान्यूज]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *